आरे कॉलोनीवर अनेक वर्षांपासून भकासकांची नजर होतीच आणि आता आरे करपून ही निघालं. पर्यावरण मंत्री रामदास कदमांनी कॅमेऱ्यासमोर सांगितलं, “ही आग कशी लागली याची सखोल चौकशी करू. ही आग लागली कि लावली याचा छडा लावला जाईल आणि यात कोणाचा हात, पाय, डोकं आहे हे पाहिलं जाईल आणि त्यानंतर कारवाई केली जाईल.” पर्यावरण मंत्र्यानंतर बाळा नांदगावकर गेले आपली सेना घेऊन आणि “आरेवर वाकडी नजर करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही,” म्हणून पुडी सोडून आले. मुंबईतल्या गिरण्या आणि त्यांच्या जमिनी वाचवू न शकलेल्या लोकांच्या तोंडी ही भाषा शोभते?
मुंबईला मँचेस्टरचा दर्जा देणारा कापड उद्योग चालवणाऱ्या गिरण्या बंद पडल्यावर त्यांचं काय करणार होतो या प्रश्नाचं उत्तर “त्या ठिकाणी पुन्हा गिरण्यांच उभ्या करता आल्या नसत्या का?” असा प्रतिप्रश्न करून देता येईल. गिरण्यांच्या ठिकाणी गिरण्या न येता तिथे काही स्वदेशी तर अनेक परदेशी कंपन्यांचे मोठमोठ्या मॉल्स मध्ये बाजार बसवले गेले, लोकांना भुरळ घालण्यासाठी स्काय स्क्रॅपर्स उठवले गेले. यातील आस्थापनांमध्ये काही स्थानिकांना नोकऱ्या मिळाल्या आणि लोंढ्यासोबत आलेल्या गलबताना बंदरंही मिळाली. परिणामी मुंबईची लोकसंख्या भयावह होईतो वाढली. मुंबईच्या पर्यावरणावरचा हा अति अतिरिक्त भार काचेच्या इमारतींच्या जंगलात दडपून गेला.
आरेची जमीन भाजून निघाली आहे. याला आपण पेरणी पूर्वीची भाजणी समजूया आणि योग्य पद्धतीने, तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने आरेला पुन्हा हिरवी पैठणी नेसावूया. यावेळी योग्य नियोजन करून वन्य प्राणी आणि आरेत राहणारे लोक यांची क्षेत्रे नेमून घेता येतील. भविष्यातील धोके टाळता येतील. “जगा आणि जगू द्या” हा निसर्गाचा नियम प्रत्यक्षात अमलात आणता येईल. करूया सुरुवात ?
2 Comments
भावना चांगलीच आहे.पण जो पर्यंत राजकीय इच्छाशक्ती प्रामाणिक नाही तोवर सर्व स्वप्ने स्वप्नच राहणार.
ReplyDeleteआपल्या प्रतिक्रियेबद्दल खूप खूप आभार सर. आपल्यासारखी साहित्य आणि सामाजिक क्षेत्रात कार्यरत असणाऱ्यांची साथ असेल तर स्वप्नपूर्ती फार लांब नाही.
DeletePost a Comment